नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारीमुळे दिल्लीत हाहाकार उडाला आहे. कठोर लॉकडाऊन नंतर देखील दिल्लीतील रुग्णसंख्या वाढतच चालली असून, मृतांचा आकडा देखील प्रचंड वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर आता दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी सत्तेत असलेल्या आप आमदारानेच केली आहे.
दिल्लीच्या मटियामहलचे आमदार शोएब इक्बाल यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. उच्च न्यायालयाकडे त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली आहे.
दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांना ना औषध मिळत आहे, ना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन. लोकांचे कोणीच ऐकत नाहीय. मला दु:ख होतेय की आम्ही कोणाचीच मदद करू शकत नाही आहोत. मी सहा वेळा आमदार राहिलो आहे. मात्र, कोणती ऐकत नाहीय. मला तर उच्च न्यायालयाने इथे राष्ट्रपती राजवट लावावी, नाहीतर इथे रस्त्यांवर मृतदेह पडलेले दिसतील, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दिल्लीत ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींकडे देखील सातत्याने ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी करत आहेत.