मुंबई: राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित आहेत. दरम्यान, दिल्लीत मोदी-ठाकरेंच्या बैठकीनंतर आता महाराष्ट्रात भाजपच्या कोअर कमिटीने एक महत्वाची बैठक बोलवली आहे. ही बैठक विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर होणार आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर उपस्थित राहणार आहे. त्यामुळे दिल्लीच्या बैठकीचे महाराष्ट्रात काय पडसाद उमटणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्यपालांच्या माध्यामतून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करत राज्यपालांना पत्र दिलं होते. तसेच भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होते. त्यामुळे मोदी ठाकरे भेटीनंतर मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
राज्यात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेत आहे. या भेटीवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून टीका केली आहे. भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र असलेला एक फोटो ट्विट केला आहे. “आज आलं अंगावर ढकललं केंद्रावरचा एपिसोड दिल्लीत. वसुलीत गर्क असल्यामुळे ठाकरे सरकारने आरक्षणाचा जो काही गुंता केलाय, तो सोडवा अशी विनंती पंतप्रधानांना करणार. झेपत नाही. कळत नाही. वसुलीपुढे सरकत नाही, अशी राज्य सरकारची तऱ्हा. सतत मागत राहता, यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?,” असं म्हणत भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.