मुख्यमंत्री ठाकरे सरकारच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. ठाकरे सरकार आणि अशोक चव्हाण सांगतात ते वेगळं आणि प्रत्यक्ष वागतात ते वेगळं आहे, असा घणाघात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे. तसेच, आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे देखील ते म्हणाले.
विनायक मेटे म्हणाले की, हे सरकार समाजाशी खोटं बोलत आहे. अनुभवी वकिलांना बाजूला केले जात आहे. सरकार मधलेच काही लोक विरोधातील लोकांना मदत करत आहेत.
अशोक चव्हाण यांच्यावर देखील विनायक मेटे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आरक्षणाचा अभ्यास करत नाहीत. ते आरक्षण प्रश्नी गंभीर नाहीत. निष्क्रिय असलेल्या श्री. चव्हाण यांना जबाबदारीतून मुक्त करावे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात यावी.मराठा आरक्षणाबाबत दोन दिवसांच विशेष अधिवेशन घेण्यात यावे. पन्नास टक्क्यांची मर्यादा तोडून ज्यांना आरक्षण दिल त्यांच्यासोबत मराठा आरक्षण एकत्रित करण्यात यावे, अशी मागणी राज्याने सर्वोच्च न्यायालयात करावी.
येत्या ६ ऑगस्टला जिल्हाधिकारी, प्रांत, तहसील कार्यालयांमध्ये निवेदन दिले जाईल. ७ ऑगस्टला राज्यातील सर्व आमदार, खासदारांना पत्र दिले जाईल. त्यानंतर लाखो लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना फोन करून मागणी करावी. ९ ऑगस्टला क्रांती दिनाच्या औचित्याने आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.