मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. यातच अनेक राजकीय नेत्यांनीही हि निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली आहे. यावर राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी नाराजी व्यक्त करत निर्यात बंदीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या झखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे भुसे म्हणाले आहेत
केंद्र सरकारने विदेश व्यापार कायदा 1992 अंतर्गत कांद्याच्या निर्यातीवर बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे. आताच्या घडीला राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 700 रुपयापासून ते 2 हजार 500 रुपये पर्यंत भाव मिळत होता. देशाच्या पातळीवर महाराष्ट्रात 75 टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते.
दादा भुसे म्हणाले, ” राज्यातून कांदा निर्यात होतो त्यापैकी 80 टक्के कांदा हा राज्यातील शेतकरी बांधवांचा आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याच्या मिळालेल्या उत्पन्नांतून आता कुठे चांगले पैसे शेतकऱ्यांच्या खिशात पडत असताना दुर्दैवाने केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घोषित केला. काल-परवा हा निर्णय घोषित केल्यानंतर कांद्याचे भाव एक हजार ते दीड हजार रुपयांनी गडगडले. हा निर्णय हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले आहेत
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी विनंती करण्यात आली आहे. येणाऱ्या कालावधीत केंद्राला याचा विचार करावा लागेल आणि निर्णय घ्यावा लागेल असे स्पष्ट मत कृषिमंत्री यांनी यावेळी व्यक्त केले.