अहमदनगर : केंद्र सरकारने पारित केलेल्या कामगार कायद्यावरून ठीक ठिकाणी आंदोलने होताना दिसत आहेत. अनेक कामगार या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. मात्र केंद्र सरकारवर याचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही, केंद्र सरकारनं हा निर्णय मागे घेतला नाही. तरी राज्य सरकारनं पुढाकार घेऊन किमान महाराष्ट्रात तरी हा कायदा लागू करू नये, अशी विनंती करणारं पत्र एका कामगारानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
तुषार बाळासाहेब सोनवणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र लिहिलं आहे. तुषार सोनवणे हे नगर येथील औद्योगिक वसाहतीत एका खासगी कंपनीत नोकरी करतात. नव्या कामगार कायद्यामुळे कामगारांच्या हक्कावर गदा येणार आहे. त्यामुळे किमान महाराष्ट्रात तरी हा कायदा लागू करू नये, अशी विनंती तुषार सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
काय म्हटलं आहे पत्रात नेमक ?
‘केंद्र सरकारनं मांडलेलं कामगार सुधारणा श्रमसंहिता विधेयक राज्यसभेत मंजूर झालं आहे. हा कायदा लवकरच देशभरात लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ते अतिशय चुकीचे व सर्वसामान्य कामगारांच्याविरोधात आहे. आधीच कायदे कामगारांचे बाजूचे नसताना आता नवीन कामगार सुधारक विधेयक पारित करून सरकार कामगारांना कंपनी व्यवस्थापन व मालकांच्या हाताचे बाहुले बनवू इच्छित आहे काय ? हा कायदा जर महाराष्ट्रात लागू झाला तर कारखाना व्यवस्थापक कारखाना मालक हे कामगारांना अक्षरश: आपले गुलाम बनून राबवून घेतील, कामगारांची मुस्कटदाबी होईल, तसेच कामगारांना आपले हक्क अधिकार मागता येणार नाहीत.
आज कामगार संघटित होऊन आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करीत आहे त्याला पुढील काळात संघटित होता येणार नाही. ज्या बोटावर मोजण्या इतक्या प्रामाणिक कामगार संघटना आहेत त्या मोडीत निघतील मी एक सर्वसामान्य कामगार आपणास आग्रहाची विनंती करीत आहे की जर केंद्र सरकारने कायदा अमलात आणला, लागू केला तर आपण हा कायदा महाराष्ट्रात लागू करू नये.’
केंद्रातील मोदी सरकारच्या या निर्णयानं महाराष्ट्रातील सर्वसामान्य कामगार अतिशय भयभीत झाला आहे. आपण पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य कामगारांना आश्वासन द्यावे, की मोदी सरकारने केंद्रात हा कायदा लागू केला तरी महाराष्ट्रातील आघाडी सरकार हा कायदा महाराष्ट्रात लागू करणार नाही. जनतेला आपण असे आश्वासन दिलं तर पुढील काळात सर्वसामान्य गोरगरीब कामगार हा नक्कीच आपल्या बाजूने उभा राहील.’, असं कामगार तुषार सोनवणे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
Read Also
इतर समाजाचे आरक्षण काढून मराठा समाजाला द्या असे आम्ही म्हणत नाही,पण…https://t.co/JUDmfGQsiV#Udayanrajebhosale #VinayakMete #Chhatrpatisambhajiraje #MarathaReservation
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 26, 2020