पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मराठा आरक्षण प्रकरणात उडी घेत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. आता पार्थ पवारांच्या या भूमिकेबाबत अजित पवार यांनी भाष्य केले आहे. प्रत्येकाला काय ट्विट करावे याचा अधिकार असतो असे सांगत ही राष्ट्रवादीची भूमिका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत असताना त्यांना यासंबंधी विचारण्यात आले. ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही हे आम्ही सांगितलेले आहे. अलीकडची मुले काही ट्विट करतात. प्रत्येक वेळेस तुमच्या मुलाने हे ट्विट केलं विचारलं जातं, मला तेवढाच उद्योग नाही. राज्यातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत, असं अजित पवारांनी म्हटलं.
दरम्यान, बीडमधील तरुणाच्या आत्महत्येनंतर पार्थ पवार यांनी ट्विट करत महाराष्ट्र सरकारने तोडगा काढण्यासाठी पावलं उचलावीत, अन्यथा सर्वोच्च न्यायालयाज जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे म्हटले होते.