अलिबाग – रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांचा पोलिसांकडून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अलिबाग येथे आल्यानंतर एएनआयशी बोलताना अर्णब गोस्वामी यांनी ”आपल्याला पोलिसांनी मारहाण केली”, असा आरोप केला होता. मात्र न्यायालयाने हा आरोप फेटाळला.
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलतानाही गोस्वामी यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. त्यांनी शरीरावरील मारहाणीच्या खुणाही प्रसारमाध्यमांसमोर दाखवल्या. या वेळी गोस्वामी हे अनवाणीच होते. पोलिसांनी मला येथे अनवाणीच आणले, असा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले की, पोलिसांनी मला घेरले आणि माझी मान पकडली. त्यांनी मला ढकलले. मला मारहाण करण्यात आली. पोलिसांना मला अनवाणीच आणले आहे.
मात्र, न्यायालयाने व्हिडीओ क्लीप आणि वैद्यकीय चाचणीचा अहवाल ग्राह्य धरत अर्णब गोस्वामी यांचे हे आरोप फेटाळून लावले. त्यामुळे आता अर्णब गोस्वामी यांची पोलीस कोठडीत रवानगी होण्याची शक्यता वाढली आहे.