मुंबई : महाराष्ट्रात कोरोनारुग्ण संख्येने उच्चांक गाठला आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. 1 मेपर्यंत ब्रेक द चेन अंतर्गत हे निर्बंध लागू राहणार आहेत. एकीकडे भाजपकडून राज्य सरकारच्या धोरणावर सातत्याने टीका केली जात आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र लॉकडाऊनच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे, तो मान्य करावाच लागेल, असे म्हणताच अमृता फडणवीस यांनी सरकारला काही सल्ले देखील दिले आहेत. त्या मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे, तो मान्य करावाच लागेल. पण राज्यात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, बेडचा अभाव आहे. त्यामुळे त्या सुविधांमध्ये वाढ करून त्या सुधारल्या पाहिजेत.
दरम्यान, महाराष्ट्रात ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सरकारने पुन्हा सुधारित नियमावली जारी करत निर्बंध अधिक कठोर केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच आता केवळ बाहेर पडता येणार आहे.