मुंबई – MPSC परीक्षा पुढे ढकलण्यावरून राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालं. गेल्या वर्षी नियोजित असलेली ही परीक्षा तब्बल पाचव्यांदा पुढे ढकलल्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले आहेत. लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं.
या सर्व तीव्र आंदोलनानंतर अखेर रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत एक फेसबुक लाईव्ह घेऊन सरकारची बाजू स्पष्ट केली. या परीक्षा एका आठवड्यातच घेणार असून आज (शुक्रवार 12 मार्च) त्याची नवी तारीख जाहीर केली जाईल, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. आणि अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी MPSC परीक्षेची नवी तारीख जाहीर केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी MPSC पूर्व परीक्षा आता 21 मार्चला होणार आहे.
गुरुवारी सकाळी MPSCचं पत्रक आल्यापासून ते आज मुख्यमंत्र्यांनी नवी तारीख जाहीर होईपर्यंतच्या कालवधीमध्ये राज्यातील वातावरण ढवळून निघालं. राज्यभरातून सरकार विरोधात तीव्र नाराजीचे पडसाद उमटत होते. आत तारीख जाहीर केल्यांनतर आतातरी हे वातावरण शांत होणार का? हे पाहणं देखील महत्वाचं आहे. परंतु या MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचं पत्रक आल्यापासून ते आत्तापर्यंत काय काय घडले ते पाहुयात…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा पुढे ढकलण्याचं पत्रक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी MPSC ची परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर गेली. 14 मार्चला होणारी ही परीक्षा आता पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याचं MPSC ने कळवलं. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचं पत्रकात म्हटलं होतं. दुपारी एकच्या सुमारास हे पत्रक प्रसिद्धीस पाठवण्यात आलं.
…आणि त्या निर्णयानंतर राज्यभरात ठिकठिकाणी विद्यार्थी झाले आक्रमक..!
MPSC ने परीक्षा पुढे ढकलल्याचं कळताच विद्यार्थ्यांमध्ये याबाबत चर्चा रंगू लागली. अखेर पुण्यामध्ये MPSC ची तयारी करत असलेले विद्यार्थी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले. याला आंदोलनाचं स्वरुप मिळून विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडलं आणि रास्ता रोको केला.
निवडणुका घेताना, राजकीय नेत्यांच्या मुलांच्या लग्नात, राजकीय अधिवेशन, आंदोलनांमधून कोरोनाचा प्रसार होत नाही, पण MPSC परीक्षांच्या वेळीच कोरोना कसा पसरतो, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. केंद्राच्या UPSC, रेल्वे आणि इतर परीक्षा होत आहेत, असं असूनही राज्य सरकार वारंवार MPSC ची परीक्षा पुढे का ढकलत आहे, असा सवालही विद्यार्थी विचारत होते.
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात राजकीय पक्षांचे नेतेही सहभागी झाल्याचं दिसून आलं. या आंदोलनात दुपारी 3 ते 4 च्या सुमारास गोपीचंद पडळकर यांची एन्ट्री झाली. पडळकरांच्या एन्ट्रीने आणि माध्यमांनी देखील आंदोलन लावून धरल्याने आंदोलनाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं तसंच आंदोलनाला धार आली. अशा वेळी पडळकरांनीही नेहमीप्रमाणे आक्रमक भूमिका घेत सरकारवर शरसंधान साधलं.
रात्री दहा वाजेपर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांच्या साथीने रस्त्यावरच ठिय्या मांडला. दहाच्या पुढे काटा सरकायला लागल्यानंतर पुणे पोलिसांनी पडळकर आणि विद्यार्थ्यांची समजूत काढायला सुरुवात केली. पण विद्यार्थी आणि पडळकर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर बळजबरीने पुणे पोलिसांनी पडळकरांना ताब्यात घेतलं.
पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गर्दी न जमवण्याचं आवाहन पोलिस आणि प्रशासन करत आहेत. अशा परिस्थितीत गुरुवारी नवी पेठ भागात हजारो विद्यार्थ्यांनी गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. याच पार्श्वभूमीवर कलम 188 नुसार पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यानंतर राज्यात नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर आणि इतर शहरांमध्येही विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं.
सरकारविरोधात विरोधकांनी केला आक्रोश मात्र सत्ताधाऱ्यांनीदेखील दिला घरचा आहेर..!
“परीक्षा रद्द करणं अत्यंत अयोग्य ठरेल, मुलं वर्षानुवर्ष मेहनत करतात, त्यामुळे परीक्षा झाल्या पाहिजेत. सरकारनं हा निर्णय रद्द केला पाहिजे,” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणार्या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा! #MPSC @CMOMaharashtra
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 11, 2021
“वेगवेगळ्या विभागाची कार्यालय सुरू आहेत, अधिवेशन होत आहे, परीक्षासुद्धा होऊ शकते, त्यामुळे ज्या तारखेला परीक्षा ठरली होती त्याच तारखेला घ्या” असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत #MPSC रविवार दिनांक 14 मार्च, 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 ही अचानक पुढे ढकलण्यात आली आहे, हा चुकीचा निर्णय घेतला गेला आहे, त्यामुळे परीक्षार्थींचे नुकसान होणार असल्याने त्याला नापसंती व्यक्त करत आहे. pic.twitter.com/UWe4kDzdJJ
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 11, 2021
#MPSC परिक्षा रद्द चा निर्णय चुकीचा.
उमेदवारांमध्ये उद्रेक -ही वेळ येऊ द्यायला नको होती.
सरकारच्या भूमिका जनतेची काळजी दूर करणाऱ्या असाव्यात.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 11, 2021
ग्रामीण भागातून आलेले हे विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला, असं भाजप नेते गोपिचंद पडळकर म्हणाले. दरम्यान, सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांच्या नेत्यांनीही या निर्णयावर टीका केल्याचं दिसून आलं.>
“असं अचानक शेवटच्या क्षणी परीक्षा रद्द करणं योग्य नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो. आधी यूपीएससीची परीक्षा झालेली आहे. काळजी घेऊन आपल्याला ही परीक्षा घेता येईल. अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांची शहरात राहण्याची सोय नाही. मी सरकारला विनंती करतो की हा निर्णय रद्द करावा,” असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
“हा निर्णय चुकीचा आणि विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळणारा निर्णय असून 3 दिवस राहिले असताना परीक्षा पुढे ढकलणं निषेधार्ह आहे. याचं समर्थन होऊच शकत नाही, तातडीने हा निर्णय बदलला पाहिजे,” असं महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबेंनी म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीसुद्धा हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली.”यापुढं कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच mpscची परीक्षाही झाली पाहिजे.”
यापुढं कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच #MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे. मुख्यमंत्री @OfficeofUT साहेब आणि @AjitPawarSpeaks दादा आपण याकडं लक्ष द्यावं, ही विनंती!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 11, 2021
या सर्व घडामोडीवर वडेट्टीवार यांच्या उत्तरवरुन कळले प्रशासनात समन्वयाचा अभाव आहे. काय म्हणाले वडेट्टीवार?
हा सगळा प्रकार सुरु असतानाच राज्य सरकारमधील तीन पक्ष तसंच प्रशासन या सगळ्यांमधील समन्वयाचा अभावही स्पष्टपणे दिसून आला. या निर्णयाबाबत आपल्याला माहिती नव्हतं, अशीच प्रतिक्रिया सरकारमधील मंत्र्यांकडून येऊ लागली.
“महाराष्ट्रातील MPSC च्या पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आपल्याला अंधारात ठेवून घेण्यात आलेला आहे. हा निर्णय सचिव स्तरावरून घेण्यात आला असून सरकारला याबाबत काहीच कल्पना देण्यात आली नाही,” असं स्पष्टीकरण राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलं.
MPSC कडून प्रसिद्ध झालेल्या पत्रकानुसर त्यांना 10 मार्च रोजी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पत्र प्राप्त झाल्याचं नमूद केलं आहे. पण हा निर्णय सचिव स्तरावरून घेण्यात आल्याचं सांगत वडेट्टीवार यांनी या प्रकरणातून अंग काढून घेतलं आहे
माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काही ही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल. @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews pic.twitter.com/fdeaHtSxcG
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 11, 2021
MPSC कडून प्रसिद्ध झालेल्या पत्रकानुसर त्यांना १०मार्च म्हणजेच काल आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पत्र प्राप्त झाल्याचे नमूद केले आहे.
कोरोना पॉजिटीव असल्यामुळे ७ दिवसांपासून मी हॉस्पिटल ला असून हा पूर्ण निर्णय सचिव स्तरावर झालेला आहे,या निर्णयाला माझे कोणतेही समर्थन नाही. #mpsc pic.twitter.com/TtCH7bOc1W— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 11, 2021
या तीव्र आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले……
दिवसभरात या सगळ्या घटनांनंतर रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकवर लाईव्ह आले. आणि म्हणाले,”MPSC च्या विद्यार्थ्यांना झालेल्या गैरसोयीबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो, “14 तारखेची परीक्षा फक्त काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मी स्वतः तारखांचा घोळ संपवा, अशा सूचना सचिवांना दिल्या आहे. शुक्रवारी (12 मार्च 2021) ही तारीख जाहीर होईल. येत्या आठवडाभरातच ही परीक्षा होईल. MPSC ची परीक्षा देण्यासाठी कुठल्याही विद्यार्थ्याला वयाच्या मर्यादेचं बंधन येणार नाही”, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही विद्यार्थी आपल्या मागणीवर ठाम होते. MPSC परीक्षा ही ठरल्याप्रमाणे 14 मार्च रोजीच घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली होती. आपण ही रात्र रस्त्यावरच झोपून घालवू, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. पण रात्री पोलिसांनी विद्यार्थ्यांना हटवून रस्ता मोकळा करून घेतला.
आणि अखेर आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे MPSC परीक्षेची नवी तारीख जाहीर केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी MPSC पूर्व परीक्षा आता 21 मार्चला होणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तसे पत्रक देखील जाहीर करण्यात आले.