अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. आतापर्यंत जमा करण्यात आलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मीडियाने प्रश्न विचारले. यावेळी निकालाची प्रत हातात आली नसल्याचे म्हटले. अनिल देशमुख म्हणाले की, ‘सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला हे ठिकंय. पण आम्हाला अजूनही निकालाची प्रत मिळालेली नाही. प्रत मिळाल्यानंतर त्यामध्ये काय लिहिले आहे याचा अभ्यास करुन आम्ही यावर प्रतिक्रिया देऊ.’
गेल्या काही दिवसांपासून अनेकांकडून सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. सुशांतच्या कुटुंबियांचीही तिच मागणी होती. मात्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी ही मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर, आज सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा सीबीआय तपास करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर भाजपकडून अनिल देशमुखांवर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.