मुंबई – मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला रात्रीचाच कोरोना असतो का? असा सवाल केला होता. त्यांच्या या प्रश्नाला शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी उत्तर दिले. त्यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मनसेवर सडकून टीका केली
“रात्रीचाच कोरोना असतो का? अशाप्रकारचे प्रश्न विचारणाऱ्यांची मला कीव येते. मी तर असं म्हणतो, सगळ्यांनी मिळून जबाबदारी घ्यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहून द्यावं की कोरोनाचा फैलाव होणारच नाही. मग विचार करता येईल की, रात्री किंवा दिवसा काय करायचं ते. मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रत्येक पावलं लोकांच्या काळजीसाठी आणि लोकांच्या हिताची आहेत.”, असं अनिल परब म्हणाले.
“मनसेचं टीका करणं हेच काम आहे. दुसरं कोणतं काम त्यांच्याकडे राहिलेलं नाही. टीका करणाऱ्यांना टीकाच करायची आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण महाराष्ट्र राज्याची जबाबादारी सांभाळायची आहे. अर्थचक्र देखील व्यवस्थित चाललं पाहजे. येणारे काही दिवस जगासाठी धोक्याचे दिवस असण्याची शक्यता आहे. ब्रिटनहून येणारा कोरोना व्हायरस लक्षात घेऊन याबाबत उपययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री याबाबत काळजी घेत आहेत. त्याचबरोबर जे कामकाज सुरु झालं आहे ते थांबणार नाही, याचीदेखील काळजी घ्यावी लागत आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.