धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदार संघात सर्वपक्षीय प्रचार सभा जोरात सुरू असून येथील अर्ज छाननी प्रक्रिया देखील नुकतीच पार पडली आहे. त्यामुळे आता 34 उमेदवार निवडणूक मैदानात शिल्लक राहिले आहेत. कोण माघार घेणार आणि किती जण रिंगणात राहणार यावर लढतीचे अंतिम चित्र 22 एप्रिल रोजी स्पष्ट होणार आहे.
विद्यमान आमदारासह अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद
धाराशिव लोकसभा मतदार संघासाठी तब्बल 36 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, यामधील विद्यमान आमदारासह अपक्ष उमेदवाराचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरविले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांचा अर्ज आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच अपक्ष उमेदवार वर्षा कांबळे यांचा देखील अर्ज बाद ठरवण्यात आला आहे.
‘या’ उमेदवारांच्या अर्जात होत्या त्रुटी
चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील आणि त्यांचे पारंपारीक प्रतिस्पर्धी शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या दोघांमध्ये निवडणुकीत मोठी लढत होणारी असे मानले जात असतानात निवडणूक अधिकाऱ्यांनी या दोघांच्याही अर्जात त्रुटी दर्शवल्या होत्या. अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी करण्यासाठी 19 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. जर 19 एप्रिलपर्यंत त्रुटींची पुर्तता झाली नाही तर, ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. मात्र दोघांच्याही अर्जातील त्रुटी पूर्ण झाल्याने यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत.