मुंबई : देशभरात करोनाची साथ वेगाने फैलावत असून, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनसाठी रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत. महाराष्ट्रातदेखील हीच परिस्थिती असून, मुख्यमंत्रीनीं काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत रेल्वेमार्गे ऑक्सिजन वाहतूक करता येईल का, असे केंद्र सरकारला चवले होते.
त्यानुसार केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी देशभरात ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यावरून आता शिवसेनेने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीका करत, ऑक्सिजन एक्स्प्रेसला होत असलेल्या विलंबाबात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणी पीयूष गोयल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
कळंबोलीहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस १९ तारखेला निघाली तरी, अजून मंगळवारी रात्री २४ तासानंतर अकोला स्टेशनवर होती. आता बुधवारी एक्स्प्रेस ट्रेन रायपूरजवळ आहे. ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टणमला जाणार आहे आणि ती फिरतेय कुठे माहिती नाही. ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वे खाते फिरवत बसले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन येण्यास अजून तीन दिवस लागतील, असा दावा सावंत यांनी केला आहे.
तसेच केंद्र सरकारवर टीका करताना, देशात करोनाचे संकट असताना केंद्र सरकार, क्रूर आणि कपटनीतीचे राजकारण करत आहे. या ऑक्सिजन एक्स्प्रेसला ग्रीन कॉरिडोअर उपलब्ध करून दिला जाईल, असे रेल्वे खात्याने सांगितले होते, पण तसे होताना दिसत नाही, असे सांगत त्यांनी, बंगालच्या निवडणुका संपायच्या आहेत. या निवडणुका झाल्या की, पंतप्रधान मोदी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करतील, असा दावा देखील केला आहे.