मुंबई : राज्यातल्या अनेक शहरांमध्ये, करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्याने, परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेते आणि मंत्री केंद्र सरकारला सातत्याने करोना लसीचा पुरवठा राज्याला वाढवण्याची मागणी करत आहेत. यावर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्येच चांगलीच जुंपली आहे.
दरम्यान, आज राज्यभरातील अनेक लसीकरण केंद्रांमध्ये करोनाच्या लसीचा तुटवडा जाणवल्यामुळे एकाएकी लसीकरण केंद्रे बंद करावी लागली. या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले असतानाच, आता भाजप नेते नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन करोना, मिनी लॉकडाऊन, व्यापार, सचिन वाझे लेटर, अनिल देशमुख, अंबानींच्या घरासमोरील स्कार्पिओ कार, यासह अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.
यावेळेस त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्र्यांवरही काही सवाल उठवले. राज्यात ५ एप्रिलपासून लागू केलेल्या नव्या नियमांमुळे, व्यापारी वर्ग संतप्त झाला आहे. तयांनी सरकारविरुध्द्व आंदोलन छेडले आहे. महाराष्ट्रातील एकही जिल्हा असा नाही, जिथे व्यापाऱ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केलं नाही. तसेच, त्यांनी या परिस्थतीचा फायदा घेऊन दुकानदारांकडून वसुली सुरू असल्याचा आरोपही केला.
मुंबईतील जुहूमधील एका दुकानात महापालिकेचे अधिकारी गेले, त्या दुकानात 3 माणसं होती म्हणून त्यांनी त्यांच्याकडून १० हजार रुपयांचा दंड घेतला. गेल्या वर्षभरापासून ज्यांचा धंदा रोडावला आहे, दिवसभरात एक रुपयाचेही गिऱ्हाईक नाही, अशा या व्यावसायिकाला १० हजार रुपयांचा दंड भरावा लागला, जर व्यापाऱ्याला १० हजार रुपयांचा दंड, मग पंढरपुरात अर्थमंत्र्यांना किती दंड? पंढरपूरात बैठक होती, अर्थमंत्र्यांना मग का नाही नोटीस? असा प्रश्न राणेंनी विचारला आहे.