मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हांडांवर विनयभंगाचा आरोप केला आहे. त्यानंतर आव्हाड यांनी ट्विट करत आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं. त्याचवेळी जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला तर तीही जागा आम्ही जिंकू, असं वक्तव्य मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे केवळ राजीनाम्याचा कांगावा करत आहेत. आव्हाडांचे हे वेडे चाळे आहेत. त्यांना निर्दोषत्व सिद्ध करता येत नाही म्हणून हा त्यांचा कांगावा सुरू आहे. तुम्ही राजीनामा द्याच आम्हीच तेथून निवडून येऊ, असं आव्हान आशिष शेलार यांनी दिलं आहे.
“माझी चोरी पकडली गेली तर पकडणारा पोलिस जबाबदार” असं @Awhadspeaks आणि राष्ट्रवादीचं वर्तन…@BJP4Mumbai @BJP4Maharashtra pic.twitter.com/Pl01bVslZU
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 14, 2022
गुन्हा दाखल होणे आणि राजीनामा याचा काय संबंध आहे. हे म्हणजे चर्चगेट गाडीच बसेन आणि मुलुंड केव्हा येईल विचारणे, असं आहे. तुम्ही कायदेशीर लढा. तुम्हाला राजीनामा द्यायचा तर द्या. तीही आम्ही जागा जिंकू, असा दावा आशिष शेलार यांनी केला.
विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यावर जितेंद्र आव्हाड कमालीचे संतापले आहेत. तक्रारदार महिलेनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल केला असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. या पोलिस अत्याचाराविरोधात आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. 72 तासांत आपल्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल झालेत. त्यामुळे पोलिस अत्याचाराविरोधात लढणार असल्याचं आव्हाड म्हणाले. यावरून आव्हाड हे कांगावा करत असल्याचं शेेलार यांनी म्हटलं आहे.