मुंबई : डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देश रसातळाला गेला असे वक्तव्य करत फडणवीस यांनी मनमोहन सिंह यांच्यावर हल्लाबोल केला होता त्यानंतर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांवर चांगलीच टीका केली होती त्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
डॉ. मनमोहनसिंग यांचे आपल्या मंत्रिमंडळावर नियंत्रण नसल्याने देश रसातळाला गेल्याचा बिनबुडाचा आरोप करण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांनी मागील साडेसहा वर्षांपासून मंत्रिमंडळावर हुकमी वर्चस्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाची कशी वाताहात झाली, याचे आत्मचिंतन केले पाहिजे असा टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
Allegation by @Dev_Fadnavis that the Nation was collapsed in tenure of Dr. Manmohan Singh Ji due to lack of control over cabinet is baseless.
Instead, he must introspect on how the Country has gone into turmoil in tenure of @narendramodi who has dominated cabinet since 6.5 years.— Ashok Chavan (@AshokChavanINC) September 19, 2020
काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात फडणवीसांना
डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देश रसातळाला गेला, असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बौद्धीक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले. डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देशानं ऐतिहासिक विकास दर गाठला एवढेच नव्हे तर त्या विकासाचा उपयोग हा जनहितासाठी करुन १४ कोटी दारिद्र्य रेषेखाली असलेल्या जनतेला गरिबी रेषेच्या वर आणले. यातून नवीन सकारात्मक आर्थिक वर्गवारी देशाला पाहायला मिळाली. अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन करुन जगाच्या इतिहासात प्रथमच अन्न सुरक्षा कायदा आणला.
याच तिमाहीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने जीडीपीच्या अधोगतीचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आणि रसातळ काय असतो याची ओळख मोदींनी स्वतःच देशाला पटवून दिली असल्याचे स्पष्ट मत थोरात यांनी व्यक्त केले होते.