दरम्यान, बेळगाव सीमाप्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले होते. बेळगाव सीमा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्यानं केंद्र सरकारनं संबंधित भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. बेळगाव म्हणजे कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. कर्नाटक सरकारनं बेळगावचं नामकरण बेलगाम करून तिथे बेलगामपणे अत्याचार सुरू केले आहेत. याविरोधात आपण पक्षीय मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद- संघर्ष व संकल्प’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
कर्नाटकात असलेलं बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून लढा सुरू आहे. या विषयावरील ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद- संघर्ष व संकल्प’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील मोठे नेते उपस्थित होते.