सोलापूर: उजनी धरणातील पाण्यावरून सोलापूर जिल्हा आणि इंदापूर तालुक्यातील राजकारण दिवसेंदिवस अधिकच पेटत चालले आहे. उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना देण्यावरून मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी सर्वेक्षणाचा आदेश रद्द केला आहे मात्र तरी देखील अजून तणाव चालूच आहे. उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याच्या निर्णयाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्थगिती दिली आहे मात्र त्याला आता चार दिवस उलटून गेले आहेत.
चार दिवस उलटल्यानंतरही अजूनही लेखी आदेश प्राप्त न झाल्याने जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे शेतकरी वर्गाची आणि सोलापूर जिल्हावासियांची दिशाभूल करत आहे आरोप उजनी धरण बचाव समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी केला आहे. उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा लेखी आदेश २५ मे २०२१ पर्यंत जर मिळाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सरकारी निवासस्थाना समोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असा संतप्त इशाराही खूपसे यांनी दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी नेत्यांच्या आक्रमकतेपणामुळेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका व्हिडिओ च्या माध्यमातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला आहे. मात्र जयंत पाटील यांनी ते वक्तव्य केल्यानंतरही अजून देखील त्यासंदर्भातील लेखी आदेश प्राप्त झालेला आहे. सांडपाण्याच्या गोंडस नावाखाली सोलापूरकरांना वेड्यात काढण्याचा पहिलेच प्रयत्न निरर्थक झालेला आहे असे खूपसे यांनी म्हटले आहे. या वेळी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे सचिव माऊली हळणवर, कार्याध्यक्ष सुहास घोडके, उपाध्यक्ष बापू मेटकरी, सहसचिव किरण भांगे, संघटक माऊली जवळेकर, सरचिटणीस आण्णा जाधव, खजिनदार अभिजित पाटील, प्रवक्ता चिमणदादा साठे, आप्पासाहेब गवळी आदी उपस्थित होते.