औरंगाबाद : राज्यात एकीकडे ऑक्सिजन आणि रेमेडीसीवर इंजेक्शन्सचा तुटवडा जाणवत असताना, दुसरीकडे काही दिवसांपूर्वी भाजपचे नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी, अहमदनगर जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा तुटवडा जाणवत असल्यामुळे, खाजगी विमान करून थेट दिल्लीतून रेमडेसीवीर इंजेक्शन्स आणून जिल्ह्यात वाटप केले होते.
दरम्यान, आता हे प्रकरण सुजय विखेंच्या अंगलटी आले असून, या प्रकरणी विखेंविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाली काढली आहे. कोर्टाने पोलिसांना या प्रकरणी स्वतंत्रपणे तपास करण्याची सूचना केली आहे. यामुळे आता सुजय विखेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.
या प्रकरणी औरंगाबाद येथे अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत डॉ. सुजय विखे यांचावर रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा साठा कोणताही कायदेशीर परवाना तसेच अधिकार नसताना वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी विनंती करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणाबद्दल सुनावणी करताना उच्च न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदवली आहेत.
या प्रकरणासंदर्भात तपास अधिकाऱ्याला फौजदारी प्रक्रियेच्या नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे, असे सांगत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना या प्रकरणातील आणखी काही कागदपत्रे पोलीस ठाण्याला देण्याची मुभा कोर्टाने दिली आहे. तसेच तपास अधिकाऱ्यांनी योग्य तो तपास केल्यानंतर फौजदारी प्रक्रियेच्या नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.