अहमदनगर : मागील काही दिवसांमध्ये नगर जिल्ह्यात बिबट्याचा त्रास प्रचंड वाढला आहे. तीन लहान बालकांना बिबट्याने उचलून नेल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले होते. अखेर पाथर्डी तालुक्यात वनविभागाला बिबट्याला पकडण्यात यश आले. यावरून आता आमदार बबनराव पाचपुते यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
बबनराव पाचपुते 2012 मध्ये वनमंत्री होते. यावेळी त्यांनी ‘बिबट्या रेस्क्यु प्रकल्प’ राबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याला त्यावेळी इतर नेत्यांनी विरोध केला होता. याचीच आठवण आता बबनराव पाचपुते यांनी करून दिली.
नगर येथे बोलताना बबनराव पाचपुते म्हणाले की, त्यावेळी राजकारणाचा भाग म्हणून इतर नेत्यांनी त्या प्रकल्पास विरोध केला होता. त्यामुळे हा प्रकल्प बारगळला. सध्या बिबट्याचे होत असलेल्या हल्ल्याला त्यावेळी विरोध करणारे नेतेच जबाबदार आहेत.
जिल्ह्यात रेस्क्यु सेंटर, बिबट्या सफारीसारखे प्रकल्प राबवून त्यांना पकडून जंगलात सोडले पाहिजे. ही समस्या गंभीर आहे. त्याबाबत गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे पाचपुते यांनी सांगितले.