नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या शेतकरी विधेयकांना देशभरातून विरोध होताना दिसत आहे. हि विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून शेतकरी दिल्ली बॉर्डरवर आंदोलन करत आहेत. देशभरातून विविध नेत्यांचा आणि पक्षांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळत असून महाराष्ट्रातून देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे सरकारचा पहिला मंत्री पोहोचला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले असून अनेक अडथळ्यानंतर त्यांना या ठिकाणी पोहोचण्यास यश मिळाले आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह दुचाकीवरून दिल्लीसाठी रवाना झाले होते. परंतु अनेक ठिकाणी त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. काल उत्तरप्रदेशमध्ये गेले असता पोलिसांनी त्यांचा ताफा अडवत त्यांना दिल्लीच्या दिशेने जाण्यास मनाई केली. त्यानंतर हरियाणामध्ये देखील त्यांना पोलिसांनी रोखले. मात्र मजल दरमजल करत अखेर ते पलवलमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी कालची रात्र रस्त्यावर झोपून काढली असून आज सकाळी ते आंदोलनस्थळी जाणार आहे.
मागील काही दिवसांपासून शेतकरी आपल्या मागण्या घेऊन याठिकाणी आंदोलन करत आहेत. हि तिन्ही शेती विधेयके रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी ज्याठिकाणी झोपून रात्र काढली त्याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.याठिकाणी चारशे ते पाचशे ट्रॅक्टरचा ताफा लागलेला आहे.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी सरकारला शेवटचा इशारा दिला असून सरकारने पुढाकार घेतला नाही तर शेतकरी संघटना देशभर चक्का जाम करतील असा इशारा संयुक्त किसान मोर्चाचे नेते बुटा सिंग यांनी दिला आहे. त्यामुळे आता सरकारपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला असून मागण्या मान्य न झाल्यास रेल्वेरोको करण्याचा देखील इशारा दिला आहे.