औरंगाबाद : कृषी विषयक तीन विधेयक काल लोकसभा आणि राज्यसभेत पास झाल्यानंतर भाजपच्या वतीने मोदी सरकारचे अभिनंदन करण्यासाठी तसेच विधेयकाच्या समर्थनार्थ पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हरिभाऊ बागडे यांनी दावा केला. बागडे म्हणाले, स्वामीनाथन आयोगाने आपल्या अहवालात ज्या गोष्टींचा उल्लेख केला होता त्याच गोष्टी कृषी विधेयकांमध्ये आहेत. काॅंग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना जी आश्वासने दिली होती, त्याचा देखील विधेयकात समावेश आहे.
मोदी सरकारने पास केलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांना हमीभाव देणारे, आपला माल देशात कुठेही विकण्याची मुभा देणारे ऐतिहासिक आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसने विधेयकाच्या मतदानावेळी वाॅकआऊट केले असले तरी त्यांनी या बिलाला विरोध केलेला नाही. शरद पवारांना विश्वासात घेतले नाही एवढीच खंत प्रफुल्ल पटेल यांनी बोलून दाखवली, या शिवाय विधेयकावर राष्ट्रवादीने फारसे भाष्य किंवा विरोध केलेला नाही, असा दावा विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी केला आहे.
शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्यानंतर त्यांना तिसऱ्या दिवशी पैसे मिळतील अशी तरतूद देखील विधेयकात करण्यात आल्याचे बागडे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काॅंग्रेसने विधेयकावर मतदान सुरू असतांना वाॅकआऊट केले याकडे बागडे यांचे लक्ष वेधले असता, राष्ट्रवादीचा या विधेयकाला विरोध नसल्याचा दावा देखील बागडे यांनी केला.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी फक्त शेती विषयावर नेहमी शरद पवारांचा सल्ला घेणाऱ्या सरकारने कृषी विधेयकाच्या वेळी मात्र पवारांना विचारना केली नाही, त्यांना विश्वासात घेतले नाही, अशी खंत व्यक्त केली. या शिवाय विधेयकावर राष्ट्रवादीने कुठल्याही प्रकारची टिका किंवा अधिकचे भाष्य कले नसल्याचे बागडे यांनी सांगितले.
विधेयकाच्या विरोधात काॅंग्रसने घेतलेली भूमिका ही नाटकी आणि राजकीय हेतूने प्रेरित अशीच आहे. केवळ विरोधाला विरोध करायचा म्हणून काॅंग्रेस कृषी विधेयकाला विरोध करत आहे. मुळात या विधेयकाने शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार बहाल केले आहेत. शेतकरी या नव्या कायद्यामुळे आता आपला माल कृषी उत्पन्न बाजर समित्यांच्या बाहेर, बांधावर देखील विकू शकतो. एमएसपी यापुढेही कायम राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी कायद्याने घेण्यात आली आली आहे.
Read Also
शेतकऱ्यांची पोरं हातात दगड घेतील आणि…https://t.co/J5WWB1KpOn#RajuShetti #KisanBill2020
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 21, 2020