अंबरनाथ : अंबरनाथ शहर मनसेचे उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. दिवंगत राकेश पाटील यांच्या कुटुंबियाची भेट घेत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि आमदार राजू पाटील यांनी सांत्वन केले. तसेच मारेकऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही केली.
पोलीस आयुक्तांकडे यासंदर्भात वास्तव मांडून आरोपींवर कारवाईची मागणी करणार असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यावेळी म्हणाले. ते म्हणाले की, मागील 15 दिवसात अंबरनाथमध्ये दोन मनसे पदाधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले झाले. त्यांच्या हातात सत्ता आहे, त्यामुळे मस्ती चालू आहे. मात्र हे चित्र बदलणार आहे, असा अप्रत्यक्ष निशाणा त्यांनी शिवसेनेवर साधला.
दरम्यान, बुधवारी अंबरनाथ शहरात बुधवारी मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची भर रस्त्यात धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यातील मुख्य आरोपी डी. मोहन याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून फक्त याच हत्येच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नव्हे, तर त्याचा पूर्वेतिहास पाहता त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी नांदगावकर यांनी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मोबाइलवर पाटील यांच्या कुटुंबियांशी चर्चा करुन त्यांना सांत्वन दिले.