मुंबई : कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 40 दिवसांपासून लाखो शेतकरी हाडं गोठवणाऱ्या थंडीत ठाण मांडून बसलेत. या आंदोलनात आतापर्यंत 60 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला असून केंद्रातील असंवेदनशील सरकारला अजून जाग आलेली नाही. या निर्दयी, अहंकारी मोदी सरकारला जागे करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी 16 तारखेला ‘राजभवनला घेराव’ घालण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
केंद्रातील मोदी सरकार अत्यंत निर्दयी असून शेतकरी, कामगार, सामान्य जनतेच्या मुद्द्यांवर कमालीचे असंवेदशील आहे. जुलमी कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून ते भांडवलदारांच्या हिताचे आहेत ही शेतकऱ्यांची भूमिका योग्य असून काँग्रेस पक्षाने वारंवार शेतकऱ्यांना पाठिंबा देत विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
केंद्र सरकारचे हे काळे कृषी कायदे महाराष्ट्र लागू केले जाणार नाहीत ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. एकीकडे शेतकरी, कामगार उद्ध्वस्त होत असताना दुसरीकडे इंधन दरवाढ करून सामान्य जनतेलाही लूटत आहे. कृषी कायदे रद्द करावेत आणि पेट्रोल- डिझेलची दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, या मागणीसाठी 16 तारखेला आंदोलन केले जाणार आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.