मुंबई : विधानपरिषदेत नीलम गोऱ्हे यांची एकमतानs उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे म्हटले. यानंतर आवाजी मतदानाद्वारे नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी नियुक्ती करण्यात आली. या निवडणुकीबाबतभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
आपण दुजाभावाचा, दबावाखाली काम करण्याचा आपण कळस गाठला असल्याचे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी रामराजे निंबाळकर यांना पत्र लिहित म्हटले की, चार वर्षांपूर्वी सभापती म्हणून निवडताना आयुष्यात राष्ट्रवादीला कधीही न केलेले मतदान आम्ही केले. परंतू आमचे सरकार असतानाही तुम्ही कधीही आम्हाला सहकार्य केले नव्हते. परंतू आज तर दुजाभावाचा, दबावाखाली काम करण्याचा आपण कळस गाठला आहे.
करोनामध्ये उपसभापतीची निवडणूक? भाजपाचे तीन सदस्य कोविड बाधित तरीही निवडणूक? सभागृहात ७८ च्या ऐवजी ६० सदस्य उपस्थित तरीही निवडणूक? कोर्टात केस पेंडिंग, तरीही निवडणूक? आश्चर्य आहे. एक निस्पृह व्यक्तीमत्व म्हणून आपल्याबद्दल आमच्या मनात असलेला आदर आज निश्चितच कमी झाला आहे. असो राजकारणात हे चालायचंच, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.