पुणे – औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समितीसमोर आला तर त्याला काँग्रेसचा विरोध असेल असं प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे औरंगाबादचं नामांतर करण्यासंबंधी सध्या शिवेसना आणि काँग्रेसमध्ये मतांतर असल्याचं समोर आलं आहे. यादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावरुन टीका केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
“औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही, तो आमचा श्रद्धेचा विषय आहे. तसंच निवडणुकीचा मुद्दा देखील नाही. अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला? ते पहिले हटवा. संभाजी महाराजांचं नाव हे संभाजीनगर शहराला असणं याबाबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून भूमिका होती. पाच सहा महिन्यांपूर्वी जेव्हा मी संभाजीनगर नामांतर व्हावं असं म्हटलं होतं तेव्हा सामनाने माझ्यावर अग्रलेख लिहिला होता,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
तर चंद्रकांत पाटील यांनी संचाय संपादक रश्मी ठाकरे याना पत्र लिहिणार असे सांगितले आहे.“सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात..अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली तिथे रश्मी वहिनी असणारं संपादकीय असू शकत नाही”. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.