निव्वळ मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का ? कोणत्या कारणासाठी ? याचा शोध मी घेत आहे असे म्हणत एकनाथ खडसे यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर आज टोलेबाजी केली. मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपाचं एकट्याच्या बळावर सरकार आणलं होतं. त्या कालखंडात आत्ता आहेत त्यातील अनेक लोक नव्हते . हे अलीकडे १०-१२ वर्षात जन्माला आलेले राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवत आहेत असे म्हणत खडसेंनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचं कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल हे सांगता येत नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.करोनाचं सावट दूर झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
भाजपकडून डावलल्या गेल्यामुळे खडसे अनेक दिवसांपासून नाराज आहेत. आज जन्म दिवसाचे औचित्य साधून नाव न घेता खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जणू इशारा दिला आहे.