मुंबई – भाजप आमदार आशिष शेलार हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. दिल्लीतील ६ जनपथ येथे शेलार हे पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात ही भेट नेमकी कशासाठी हे अद्याप समोर आलेलं नाही. पण या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकीय वर्तुळात यामुळे पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे.
राज्यात भाजप आणि महाविकासआघाडीत यांच्यात अनेक मुद्द्यांवरून वाद आणि आरोप-प्रत्योरोप सुरु आहे. भाजपकडून सतत महाविकासआघाडीला लक्ष्य केलं जात आहे. त्यात शेलार हे पवारांच्या भेटीला पोहोचल्याने पुन्हा राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. याआधीही शेलारांनी अशीच पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून त्यांच्या सोबतचा फोटो देखील शेअर केला होता.
राज्यातील राजकारणात विविध घडामोडी सुरु आहेत. याआधी भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याचा दावा काही नेत्यांनी केला होता. आशिष शेलार आणि शरद पवार यांच्यातील ही भेट नेमकी कशासाठी होती. हे अजून समोर आलेलं नाही. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शेलार आणि पवार भेटीमागील शक्यता
गेल्या दीड महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून काल सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोनल तीव्र करण्याचा निर्धार विरोधकांनी केला असून शरद पवार या कामाला लागले आहेत. त्यामुळे पुढील काळात केंद्राची डोकेदुखी वाढणार आहे. शेतकरी आणि विरोधकांचा दबाव आल्यास केंद्राला कृषी कायदे रद्द करावे लागू शकतात. ही नामुष्की ओढवू नये म्हणून केंद्र सरकारने आतापासूनच हालचाली सुरू केल्या असून पवार-शेलार भेट हा त्या धाग्याचं एक टोक असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. कृषी कायद्याच्या निमित्ताने विरोधक एकत्र आल्यास भाजपला केरळ, पश्चिम बंगालसह पाच राज्यांची निवडणूक जड जाऊ शकते. ते घडू नये म्हणूनही केंद्र सरकार सक्रिय झाल्याचं सांगण्यात येतं.
दुसरं कारण म्हणजे ईडीच्या मुद्दयावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. केंद्राकडून ईडीचा राजकीय सूडबुद्धीतून वापर केला जात असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यानुषंगानेही या बैठकीत काही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.