कोलकत्ता – पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात जोरदार मुसंडी मारली आहे. यावर विषयावर बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ममता बॅनर्जी झाशीच्या राणी प्रमाणे लढल्या. मै अपना बंगाल नहीं दुंगी अशी प्रतिज्ञा ममता यांनी केली होती. मोदी, अमित शाह यांच्या एक दिवसआड सभा होत होत्या. 8 ते 10 मंत्री ठाण मांडून बसले होते पण उपयोग झाला नाही, असं भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळांनी बंगालच्या निकालावरुन भाजपवर टीका केली होती. याबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळांनाच इशारा दिला आहे. पाटील म्हणाले की, छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळं तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरीवर बोला, असं ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये ममता जिंकल्या तर ईव्हीएम बरोबर आहे आणि आसाममध्ये भाजप जिंकली तर ईव्हीएम चूक आहे, असं होत नाही. बंगालमधील पराभवाचं दु:ख तर वाटणारच. आम्ही कुठलीही गोष्ट कार्यकर्ते म्हणून करतो. आम्ही निवडणुका फार गांभिर्याने घेतो. पराभव जरी झाला असला तरी भाजप विरोधात सगळे एकत्र आले होते हे लक्षात घ्यायला हवं. वर्षानुवर्षे तिथं सरकारमध्ये असलेले नाही च्या बरोबरीने दिसत आहेत, असं पाटील म्हणाले.
ते म्हणाले की, काँग्रेस आणि डाव्यांनी तृणमूलच्या पारड्यात आपली मतं टाकली. देशात आता भाजप विरुद्ध सगळे अशी स्थिती आहे. भाजप विजयी झाला की प्रामाणिकपणे कारभार होणार आणि तुमची प्रकरणं बाहेर काढणार ही भीती असते. त्यामुळं काहीही करा पण भाजपला पराभूत करा हाच फंडा पश्चिम बंगालमध्ये चालला, असं पाटील म्हणाले.