आत्महत्या केलेल्या शेतकर्यांचा महाविकास आघाडी सरकारवर रोष असून शेतकर्यांपर्यंत कोणतीही मदत न पोहोचल्यामुळे व कोणतेही आर्थिक पॅकेज घोषित न झाल्यामुळे आत्महत्यांच्या या घटना घडल्याचे माजी पालकमंत्री व भाजपाचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
जानेवारी ते जून या 6 महिन्यात सरासरी दररोज सहा शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्याचा सर्वाधिक फटका राज्यातील शेतकर्यांना बसला आहे. विशेषत: फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले. शेतकर्यांच्या मालाची नासाडी झाली. यासाठीच फळ आणि भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना आर्थिक पॅकेज द्यावे व आर्थिक संकटातून बाहेर काढावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, जानेवारी ते जून दरम्यान झालेल्या शेतकर्यांच्या आत्महत्यांमध्ये जूनमध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. लॉकडाऊनमुळे मालाची वाहतूक थांबली. किरकोळ बाजारात भाजीचे भाव कोसळले. त्यामुळे शेतकर्यासमोर आर्थिक संकट कोसळले. पण मदत कुठूनच मिळाली नाही. परिणामी शेतकर्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले. मागील वर्षी मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड पाऊस झाला. पुरामुळे पश्चिम महाराष्ट्रातल पिके नष्ट झाली होती. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकर्यावरील इतर ताण वाढला व शेतकरी नागवला गेला. या सर्व स्थितीचा विचार करता गरीब व मध्यमवर्गीय शेतकर्यांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आर्थिक पॅकेज घोषित करावे अशी मागणीही बावनकुळे यांनी केली आहे