मुंबई : पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहे. महाराष्ट्रात देखील पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडेल. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रवक्ते, नेते निवडणूक निकालांच्या चर्चेत सहभागी होणार नाहीत, असा निर्णय घेतला आहे. यावरून आता भाजप नेते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.
कोरोनाची भीषण परिस्थिती बघता पाच राज्यांच्या निवडणूक निकालांच्या चर्चेमध्ये महाराष्ट्र काँग्रेस पक्षाकडून कोणीही सहभागी होणार नाही, असे ट्विट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केले. यावर आता अपयशासाठी शोधलेली ही पळवट असल्याचे म्हणत केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.
@INCIndia चा पाच राज्यांच्या #Elections2021 टीव्हीवरच्या चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय म्हणजे कोरोनाचे निमित्त करून येणाऱ्या अपयशापासून पळण्यासाठी शोधलेली पळवाट आहें
◾️कॅाग्रेसने निवडणूकीत भाग घेतला
◾️राहूल गांधीसह सर्व नेत्यांनी प्रचार केला
◾️सभा सुध्दा केल्या— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 2, 2021
केशव उपाध्ये म्हणाले की, काँग्रेसचा पाच राज्यांच्या #Elections2021 टीव्हीवरच्या चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय म्हणजे कोरोनाचे निमित्त करून येणाऱ्या अपयशापासून पळण्यासाठी शोधलेली पळवाट आहे. काँग्रेसने निवडणुकीत भाग घेतला, राहुल गांधींसह सर्व नेत्यांनी प्रचार केला, सभा सुद्धा केल्या होत्या.
दरम्यान, जेव्हा देश अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले आहे, अशा स्थितीमध्ये त्यांना जबाबदार न धरता निवडणुकी विजय-पराभवावर चर्चा करणे आम्हाला योग्य वाटत नाही. त्यामुळे काँग्रेसने निवडणूक निकालांच्या चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी दिली आहे.