मुंबई : देशात आणि राज्यात सध्या असलेल्या करोनाच्या वाईट परिस्थितीवरुन केंद्र आणि राज्य, तसेच राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. देशात बुधवारी आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक ३. १४ लाख रुग्णांची नोंद झाली आहे. जगात कुठल्याही देशात एका दिवसात सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत.
दरम्यान, यावरून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत, “लसीकरणात तुम्ही देशवासीयांना प्राधान्य का दिलं नाही? तुम्ही प्रसिद्धीत व्यस्त आहात. करोनाची लस मॉरिशिस, नेपाळला जात असल्याचे आम्ही पाहात होतो. तुम्ही सहा कोटी लस निर्यात केल्या आणि देशवासियांना तीन ते चार कोटी लसी दिल्या. योग्य धोरण नसल्यानेच तुटवडा जाणवत आहे,” अशी टीका केली. याला भाजप महाराष्ट्र्चे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
“करोनाची राज्यातील स्थिती अतिशय भयानक आहे. महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. स्वतः काहीच करायचे नाही आणि काहीही झाले की केंद्राच्या नावाने खडे फोडायचे, हा एकमेव उद्योग केला जात आहे. अशात प्रियंका गांधी एक मोठी मुलाखत दिलेली आहे. काय केले पाहिजे, याचे त्यांचे ज्ञान पाहता हवे तर त्यांची मदत घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा,” असा सल्ला भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांना नाना पटोले यांना दिला आहे.
तसेच, हवे तर डॉ. मनमोहन सिंग यांनी लिहिलेल्या सर्व सूचना राज्यात अंमलात आणा, प्रियंका गांधी यांना काही दिवस राज्यात बोलवा, पण महाराष्ट्रातील स्थिती आता आटोक्यात आणली पाहिजे. त्यामुळे आपण प्रियंका गांधी यांच्या तज्ज्ञतेचा फायदा महाराष्ट्राला कसा मिळेल, तेवढे फक्त पहा,” असा उपरोधिक टीकात्मक सल्लादेखील उपाध्ये यांनी नाना पटोले यांना दिला आहे.
दुसरीकडे राज्यात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या रुग्णसंख्येयमुळे, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासन, तसेच करोना महामारीशी संबंधित इतर यंत्रणा आणि संबंधित लोक यांच्यावर प्रचंड प्रमाणात ताण आला आहे. करोना लसीकरणावर भर दिला जात असला, तरी लसींचा तुटवडा, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्सच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.