मुंबई : ज्यावेळी धनगर समाजाची लोकसंख्या मोजली जाईल, त्यानुसार आरक्षण दिलं जाईल, त्यामुळे आदिवासींच्या आरक्षणावर कुठेही परिणाम नाही. आदिवासींनी गैरसमज करण्याचं कारण नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी नव्हे तर एसटी अंमलबजावणी मागणी आहे असं स्पष्ट मत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले आहे.
यावेळी बोलताना पडळकर यांनी मराठा आरक्षणाबाबत देखील भाष्य केले. एसटी, एससी आणि ओबीसी हे केंद्र सरकारनं दिलेलं आरक्षण आहे, ओबीसी हे केंद्रानं दिलेलं आरक्षण आहे, मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे राज्य सरकारने त्यांच्या अधिकाराखाली दिलं आहे. त्या आरक्षणाला कोर्टात स्थगिती मिळाली आहे, कोणीही गैरसमज करू नये, पण जे कोणी ओबीसी आणि मराठा समाजात संघर्ष लावण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना यश येणार नाही असं मत पडळकर यांनी व्यक्त केलं आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं अस जे मागणी करत आहेत, त्यांचा प्लॅन दिसतोय की, मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळू नये. त्याचसोबत धनगर आणि आदिवासी समाजात जे भांडण लावतायेत, त्यांनी समजून घ्यावं, एसटी आरक्षण हे लोकसंख्येच्या आधारावर आहे असे पडळकर यावेळी म्हणाले.
तसेच धनगर समाजाचा अध्यादेश राज्य सरकार काढणार आहे का ? की केंद्राकडे पाठवणार आहे ? राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, आमचं मूळचं आरक्षण आहे, त्यामुळे नव्याने आरक्षणाची गरज नाही, जेव्हा राज्य सरकार केंद्राकडे शिफारस करेल तेव्हा आम्ही केंद्र सरकारकडे जाऊ, शब्दाच्या गफलतीमुळे धनगर एसटी आरक्षणापासून वंचित आहे.
हरियाणा सरकारनं तेथील धनगरांना अध्यादेश काढून आरक्षण दिलं आणि ते केंद्राकडे पाठवलं आहे. आमचा प्रश्न कसाही मिटवावा, धनगर समाजाबाबत राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, त्याप्रकारे आमची पुढील भूमिका राहील, समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे काही करावं लागेल ते करणार. आरक्षणासाठी समाजाला जे लागेल त्यांच्यासोबत मी आहे असंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.
Read Also
दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडून सोडवून घ्यावाhttps://t.co/W2Slt4nWRi#SharadPawar #ChhatrpatiUdayanrajebhosale #Sambhajiraje #NCP #BJP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 29, 2020