महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समवेत कोरोनाविषयक आढावा बैठकीसाठी आल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या. यामध्येच एका कार्यकर्त्यांने प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी घेऊन गेल्यानंतर कामे होत नसल्याचं सांगितले. यावर उत्तर देताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केले आहे.
कामं होत नसतील तर दंगा करा. भीक मागितलं तर कोणी देत नाही, अधिकार हिसकावून घ्यावे लागतात. कोणत्याही तालुका अध्यक्षाने अशी तक्रार करु नये. तुम्हाला तालुका अध्यक्ष केलं आहे, तुमचा तालुका तुम्ही सांभाळला पाहिजे. त्याला ताकद देण्याचं काम आम्ही करु’ असे वक्तव्य महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं.
मात्र या सल्ल्यावरुन भाजपाने ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेस मंत्र्याना सवाल विचारला आहे. यात म्हटलं आहे की, कामं होत नसतील तर दंगा करा, मंत्री यशोमती ठाकूर यांचा कार्यकर्त्यांना सल्ला तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात म्हणतात, कार्यकर्त्यांनी धाक निर्माण करण्यासाठी समूहाने शासकीय कार्यालयात जावे. महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच टगेगिरी हीच महाभकास आघाडीतील मित्र पक्षांची संस्कृती असल्याचा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला आहे.
टगेगिरी हीच महाभकास आघाडीतील मित्र पक्षांची संस्कृती… https://t.co/w9mIJ2SMDd
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 9, 2020