मुंबई – भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आमदार प्रसाद लाड यांच्या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे.
भाजप आमदार प्रसाद लाड हे जवळपास पाऊणतास कृष्णकुंजवर होते. प्रसाद लाड हे कृष्णकुंजवर आले तेव्हा त्यांचं स्वागत दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर खुद्द राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी केलं.
प्रसाद लाड हे तसे राज्यातील बडे नेते नाहीत. ना त्यांनी कोणतंही मंत्रिपद भूषवलं आहे. पण तरीही प्रसाद लाड यांच्या स्वागताला राजपुत्र अमित ठाकरे आले. तसं पाहता घरी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत घरचे मंडळी करतात, ही संस्कृती आहेच. मात्र राजकारणात कोण कोणाचं स्वागत करतं याला विशेष महत्त्व आहे. प्रसाद लाड हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा कोणता निरोप घेऊन प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतली का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दरम्यान, प्रसाद लाड यांच्या भेटीनंतर येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र येऊन महापालिकेवर असलेली शिवसेनेची सत्ता उलथवून टाकणार असल्याचे संकेत मिळत आहेत