मुंबई : कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर हळूहळू अनेक गोष्टी उघडण्यास राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली. मात्र अद्याप मंदिरे उघडण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही. सध्या राज्यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे, असे असले तरी कोरोनामुळे सरकारने मंदिर न उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे. याविरोधात आता भाजपकडून ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशी हाक देत आज राज्यभर मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन केले जात आहे.
राज्यातील मंदिरं, देवस्थान सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजप आणि अध्यात्मक समन्वय आघाडी आज घंटानाद आंदोलन करणार आहे. बुलढाण्याच्या संग्रामपूरमधून आंदोलनाचा सुरुवात करण्यात आली. मुसळधार पावसातही संग्रामपूरच्या जगदंबा मंदिरासमोर भाजप कार्यकर्त्यांकडून घंटनाद आंदोलन करण्यात आले.
पुण्यातील सारसबाग, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वारासह 9 ठिकाणी, मुंबईत सिद्धिविनायक मंदिरासमोर अशा राज्यभरातील विविध ठिकाणी भाजप आंदोलन करणार आहे.
केंद्र सरकारने राज्यांमधील मंदिरं खुली करण्याची परवानगी दिली आहे, पण महाराष्ट्र सरकारच अजून मंदिरं खुली करण्यास तयार नाही, असा आरोप विविध धार्मिक संस्थानांनी केला आहे.