मुंबई: राज्यात मराठा, ओबीसी आरक्षण, एमपीएससी परीक्षा तसेच इतर अनेक प्रश्नांवरुन वातावरण तापलेलं असताना पावसाळी अधिवेशनाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधणं टाळलं आहे. प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत असतात. मात्र, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेणं टाळलं आहे. त्यांच्या या कृतीनंतर आता राज्यात अनेक चर्चेला उधाण आलं आहे.
प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधतात. यावेळी पत्रकारंनी विचारलेल्या प्रश्नांचीही ते उत्तरं देतात. अधिवेशन सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेण्याची प्रथा आहे. मात्र, याच प्रथेला फाटा देत ठाकरे यांनी पत्रकार परिषद टाळली आहे. त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय गोटात चर्चांना उधाण आले आहे. ठाकरेंनी पत्रकार परिषद टाळल्याननंतर भाजप नेते नितेश राणे यांनी खोचक टीका केली आहे. त्यांनी “आमचा नेते पावरफूल…मुख्यमंत्री झाले गुल,” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद तसेच रिकामी खुर्ची असलेल्या पत्रकार परिषदेचा फोटो पोस्ट केला.
यापूर्वी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भाजप नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीआधी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी बोलताना कोरोनाच्या नावाखाली अधिवेशन संपवलं जात आहे. जे मुद्दे मांडू दिले जाणार नाहीत ते जनतेच्या फोरमवर जाऊन मांडू. राज्य सरकारनं अधिवेशनापासून पळ काढलेला आहे. हे सरकार अधिवेशनाला तोंड देऊ शकत नाही, असा घणाघाती आरोप केला आहे.
पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार
दरम्यान, सोमवारपासून सुरु होणारे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच इत मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. तर याच अधिवेशनात सत्ताधारी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.