दिल्ली : देशातील ११ राज्यांमधील ५६ विधानसभा मतदारसंघांत ३ आणि ७ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुका होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पोटनिवडणुकांची घोषणा केली.
मध्य प्रदेश (२८), उत्तर प्रदेश (७), छत्तीसगढ (१), गुजरात (८), हरियाणा (१), झारखंड (२), कर्नाटक (२), नागालँड (२), ओडिशा (२), तेलंगणा (१) या १० राज्यांतील ५४ विधानसभा जागांवर ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुका होतील. बिहारमध्ये एक लोकसभा मतदारसंघ तर, मणिपूरमधील दोन विधानसभा मतदारसंघांत ७ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होईल. आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि तमिळनाडू या चार राज्यांमधील पोटनिवडणुकांच्या तारखा संबंधित मुख्य सचिवांकडून अहवाल आल्यानंतर जाहीर केल्या जातील.
या पोटनिवडणुका मध्य प्रदेशसाठी सर्वाधिक महत्त्वाच्या असून राज्यातील २८ जागांवरील निकालांवर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारचे भवितव्य अवलंबून असेल. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागा असून बहुमतासाठी ११६ जागांची गरज आहे. भाजपकडे १०७ संख्याबळ आहे. काँग्रेसकडे ८८, बसपकडे २, सपकडे १ आणि ४ अपक्ष आहेत.
भाजपला सत्ता राखण्यासाठी आणखी ९ जागांची आवश्यकता आहे. तर काँग्रेसला पुन्हा सत्तेचा दावा करण्यासाठी २८ जागांची गरज लागेल. काँग्रेस सोडून ज्योतिरादित्य शिंदे यांनी समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या समर्थकांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला सत्ता सोडावी लागली.
गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपपेक्षा काँग्रेससाठी ही पोटनिवडणूक महत्त्वाची असेल. पटेल समाजातील तरुण नेते हार्दिक पटेल यांना काँग्रेसने नुकतेच प्रदेश कार्याध्यक्ष बनवले असून भाजपच्या बालेकिल्ल्यात हार्दिक यांना राजकीय कर्तृत्व सिद्ध करावे लागणार आहे. उत्तर प्रदेशची जबाबदारी असलेल्या काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वढेरा सातत्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत असून राज्यात त्या सक्रिय झाल्या आहेत.
Read Also :
बाबरी निकालापूर्वीच ‘ते’ म्हणाले,होय मीच तोडला ढाचा ! फाशी झाली तरी चालेलेhttps://t.co/L8fUwhWFx7#BabariCase #Ayodhya #Rammandir #BjpLeader
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 30, 2020