नवी दिल्ली : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. दररोज 50 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळत असल्याने स्थिती भयानक झाली आहे. राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर आता दहावी-बारावीच्या परीक्षा देखील रद्द करत विद्यार्थ्यांना पास करण्याची मागणी पुढे येत आहे.
दहावी-बारावी वगळता इतर वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्याची मागणी देखील आता केली जात आहे. यासंदर्भात पालक संघटनांकडून पंतप्रधान मोदींना विनंती करण्यात आली आहे.
इंडिया वाईड पॅरेंटस असोसिएशनने यासंदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन दहावी आणि बारावीसह विद्यापीठांच्या परीक्षा या अंतर्गत मूल्यमापन करुन विद्यार्थ्यांना पास करण्याचे धोरण जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, नियोजित वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार आहेत. मात्र राज्य सरकार ऑफलाईन परीक्षा रद्द करत ऑनलाईन परीक्षा घेणार की सरसकट परीक्षाच रद्द करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.