मुंबई : राज्यातल्या अनेक शहरांमध्ये, करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्याने, परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेते आणि मंत्री केंद्र सरकारला सातत्याने करोना लसीचा पुरवठा राज्याला वाढवण्याची मागणी करत आहेत. यावर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्येच चांगलीच जुंपली आहे.
दरम्यान, आज राज्यभरातील अनेक लसीकरण केंद्रांमध्ये करोनाच्या लसीचा तुटवडा जाणवल्यामुळे एकाएकी लसीकरण केंद्रे बंद करावी लागली. या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले असतानाच, आता भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर बोलताना, ‘कुटुंबं सांभाळू शकत नाही, ती व्यक्त करोना रुग्णांना कसं सांभाळणार, असा सवाल करत ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” असताना कुटुंबातील सगळे जण रुग्णालयात कसे? म्हणजे कुटुंब सांभाळू शकत नाही, ती व्यक्ती महाराष्ट्र व करोनाबाधित रूग्णांना कसे सांभाळणार? हे अपयश आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक बाण फेकले.
त्यांनी राज्याच्या या परिस्थितीला हे सरकार जबाबदार आहे असे सांगत, राज्य सरकारला दूषणं दिली. करोनाचे राज्य सरकारला गांभीर्य नाही. महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. करोना संसर्ग वाढत असताना, त्यावर उपाययोजना करायला हे सरकार कमी पडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे केंद्राकडे बोट दाखवत आहेत, असं ते म्हणाले.
तसेच, राज्यात डॉक्टर्स नाही. जसे “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” असे म्हणता, तर कुटुंब म्हणून महाराष्ट्राला सर्व गोष्टी उपलब्ध करून देणे, रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार करणे, त्यांना बरं करणे, ही तुमची तुमची जबाबदारी नाही का? पिंजऱ्यात जाऊन बसत आहात, स्वतःला लॉकडाऊन करून घेतले आहे. मातोश्रीच्या बाहेर पडत नाही, अशी प्रश्नांची जंत्रीच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.