मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या परिस्थितीवरून राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात टीकायुद्ध सुरु असलेले पाहायला मिळत आहे. यातच आज राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासह त्यांच्या १० मालमत्तांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत. यावरून देशमुख यांच्यावर करण्यात आलेली कारवाई म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात येत आहे.
या विषयवार प्रसार माध्यमांशी बोलत असताना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी, अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सुरू असलेली कारवाई कायदेशीर असल्याचं सांगत, ‘काही जण जात्यात आहेत, काही जण सुपात आहेत. सगळ्यांचा हिशोब परमेश्वर करत असतो,’ असं सूचक इशारा दिला आहे.
तसेच, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय कारवाई करतेय. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आधी सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं. आता उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार सीबीआयची कारवाई सुरू आहे, असे सांगत त्यांनी, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी या कारवाईला, भाजपचं कारस्थान म्हटलं. त्यांचा आरोप हास्यास्पद आहे, असं म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी, देशमुख यांची सीबीआय चौकशी होते. त्यांना राजीनामा द्यावा लागतो. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल होतो. त्यांच्या मालमत्तांवर धाडी पडतात. शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली आहे.
काही जण सुपात आहेत, तर काही जण जात्यात आहेत. त्यामुळे काही काळजी करू नका, परमेश्वर सगळ्यांचा हिसाब-किताब पूर्ण करतो !https://t.co/sR1ZCECKke
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 24, 2021