मुंबई : महाराष्ट्रातील करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारचे धाबे दणाणले असून, शासन आणि प्रशासनाने त्या अनुषंगाने कठोर उपाययोजना करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सरकारने ५ एप्रिलपासून करोना प्रतिबंधक नवीन नियमावली जाहीर केली आहे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांना करोना लस टोचवून घेण्याचे आवाहन देखील सरकारकडून केले जात आहे.
दरम्यान, आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला, यात त्यांनी “कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या ही चिंताजनक बाब आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, परिचारक, आरोग्य कर्मचारी अहोरात्र कष्ट घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारला काही कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत. केंद्र सरकारही या संबंधी आग्रही असल्याचे म्हटले.
तसेच त्यांनी, “कालच मी देशाच्या आरोग्य मंत्र्यांशी संपर्क साधला. ज्या काही कमतरता असतील त्यासंबंधी चर्चा केली. केंद्र सरकारचा आरोग्य विभाग पूर्ण ताकदीनिशी राज्यांच्या पाठीशी आहे. त्यांची मदत आणि आपल्या सगळ्यांचे सामूहिक प्रयत्न यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे,” असे सांगत केंद्राकडून मिळत असलेल्या सहकार्यची माहिती दिली.
यावेळी त्यांनी, “शेतकरी, कामगार, नोकरदार, हमाल, व्यापारी, व्यावसायिक, कष्टकरी प्रत्येक घटकाला या संकटामुळे झळ बसली आहे. दुकानं व व्यापार-धंदे बंद असल्यामुळे नुकसान होत आहे. फळे-भाजीपाला या नाशिवंत मालाच्या विक्रीचा प्रश्न उभा राहिल्याने शेतकरी वर्गाचंही अपरिमित नुकसान झालं आहे, हे मान्य केले मात्र या परिस्थितीला धैर्याने सामोरं गेलं पाहिजे, असेही ते म्हणाले.
त्यांनी समाजातल्या सर्व घटकांना विनंती केली की आपल्याला वास्तव नाकारून चालणार नाही. जनतेच्या जीविताच्या दृष्टीने काही अपरिहार्य निर्णय राज्य सरकारला घ्यावेच लागतात. हे निर्णय राबवण्यासाठी आपल्या सगळ्यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पवारांनी सगळ्या राजकीय नेत्यांना, प्रसारमाध्यमांना, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांना समाज माध्यमांद्वारे विनंती केली की, “परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नात आपले सहकार्य असू द्या. महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस, सर्व घटक अशा संकटाच्या काळात बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून हिमतीने सामोरं जाण्यासाठी यंत्रणेला सहकार्य देतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. या सामुदायिक प्रनयत्नांतू आपण कोरोनावर निश्चित मात करू आणि या संकटातून नागरिकांची सुटका करू.”