पुणे: अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. करोनाच्या संकटकाळात अजित पवार उपलब्ध नाहीत. ते सध्या आहेत तरी कुठे? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला होता. महामारीचे वाढत प्रमाण रोखण्यासाठी लोकांचं बाहेर फिरणं, एकमेकांना भेटणं बंद केलं पाहिजे. लॉकडाउनची गरज आहे हे योग्य असलं तरी त्यानंतर लोकांचे जे हाल होणार आहे त्याची काळजी करायची की नाही. तुटपुंज पॅकेज द्यायचं आणि तेदेखील अजून हातात पडलेलं नाही, “अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांवर जोरदार पलटवार केला आहे . भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले होते. किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती असे देखील यावेळी ते म्हटले आहेत.
भाजपच्या आरोपानंतर संतापलेल्या अजित पवार यांनी आपलं आठवड्याभराचं शेड्युल सांगून टाकलं आहे . दररोज सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष भेटीसाठी मी सर्वांना उपलब्ध असतो. सन्माननीय मुख्यमंत्री, मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी सर्वांशी दिवसभर संपर्क, संवाद सुरु असतो. भाजपचेही कितीतरी आमदार, आजी – माजी नेते दररोज भेटतात. तेही दिवसभर फोन करतात. मंत्रालयात सोमवार ते गुरुवार सकाळी नऊ वाजता मी हजर असतो. पुण्यात शुक्रवार, शनिवारी आणि रविवारी बारामतीत दिवसभर कार्यक्रम सुरु असतात. गेली दीड वर्षे हा कार्यक्रम अखंड सुरु आहे. मी नेहमीच जनतेच्या संपर्कात राहणार आणि ग्राउंड लेवल ला काम करणारा माणूस आहे त्यामुळे तुम्ही तुमचा मेंदू तपासून घ्यावा असा टोला अजित पवारांनी मारला आहे.