मुंबई : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. तसेच हि बंदी उठवावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी हि निर्यात बंदी तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे.
हजारो क्विंटल कांदा मुंबई बंदरात अडकला असून त्याची निर्यात प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी यासंदर्भात खासदार शरदचंद्र पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली असून कांदा निर्यात बंदी तातडीने हटवावी यासाठी केंद्र सरकारकडे ते स्वतः प्रयत्न करणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली
देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर आता कुठेतरी बाजार सुरळीत होत होते. त्यातून अत्यंत कष्टाने पिकविलेल्या कांद्याला चांगला भाव मिळत असतांना केंद्र सरकारने अचानकपणे कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. एकीकडे चाळीमध्ये साठविलेला कांदा खराब होत आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा तोटा होत असतांना कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक फटका बसत आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी खासदार शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून केंद्र सरकारकडे बाजू मांडली जाणार आहे.