नाशिक : तुफान प्रचार, पंतप्रधान मोदींपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रचारसभानंतर देखील भाजपला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने 200 पेक्षा अधिक जागा मिळवत सत्ता कायम राखली आहे. ममता बॅनर्जींच्या विजयावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ‘ममता बॅनर्जी झाशीच्या राणी प्रमाणे लढल्या’, असे म्हणत कौतुक केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, बंगालची ममता दीदी एकटी आणि हे सगळे अशी ही सगळी लढाई सुरू होती. पण ज्या प्रकारे झाशीच्या राणीने मेरी झाशी नही दुंगी.. असं म्हटलं होतं, त्याच प्रकारे ममता बॅनर्जी देखील मेरा बंगाल नही दुंगी..असं म्हणत लढल्या.
बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे 8 ते 10 मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. पण उपयोग झाला नाही. भाजप विरोधात देशात प्रचंड लाट तयार झाली आहे, असा टोला देखील छगन भुजबळ यांनी लगावला.
पंढरपूर विधानसभा निवडणुकीवर बोलताना ‘हा निकाल गटतट आणि इतर स्थानिक राजकारणामुळे लागत आहे. त्यावरून देशाचा कल बांधता येत नाही’, असे ते म्हणाले.
दरम्यान, भुजबळ यांनी बंगालच्या निकालानंतर भाजपवर हल्ला चढवला होता. या टीकेला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले. जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळं तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल, असा इशाराच चंद्रकांत पाटील यांनी दिला.