मुंबई : राज्यात महामारीच्या लाटेने कहर केला आहे. या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकार हर तऱ्हेने प्रयत्न करत आहे, तरीही दिवसेंदिवस महामारीने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढतच आहे. तर दुसरीकडे मृत्यूदर देखील उंचावत आहे. यातच राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून रेमेडीसीवर इंजेक्शन्स, बेड्स, व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन, लसींचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होतानाचे चित्र आहे.
दरम्यान, काल सत्ताधारी पक्षातील मंत्री जयंत पाटील तसेच, विजय वडेट्टीवार यांच्यानंतर आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील राज्यातल्या लॉकडाऊनबाबत विधान केले आहे.
एबीपी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी, “लॉकडाऊन कोणालाही आवडत नसून माझाही आधीपासून विरोध आहे. पण आरोग्य सुविधा संपत आहेत. असाचा मारा सुरु राहिला तर खूप मोठा गोंधळ होईल. लॉकडाऊन करुन साखळी खंडित करणे आणि रुग्ण वाढणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे.” असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यातल्या वाढत्या महामारीच्या प्रादुर्भावामुळे, राज्य सरकारने १४ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर, सातत्याने यामध्ये आणखीन निर्बंधांची वाढ करून, २२ एप्रिलपासून जिल्ह्यांतर्गत आणि राज्याबाहेरील प्रवासावरही बंदी घालण्यात आली.
तसेच, लोकल आणि बससेवाही सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. आता १ मेपर्यंत ही नवीन नियमावली लागू राहणार आहे. परंतु, तरीही रुग्णांची वाढती संख्या पाहता, १ मे नंतरही राज्यात लॉकडाऊन वाढणार का, असा सवाल आता सामान्य नागरिकांकडून सरकारला विचारला जात आहे.