मुंबई – महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमावरून गेले दोन दिवस दिल्लीच चर्चा होती. यासंदर्भात सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहीले. ते पत्र मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले आहे. मुख्यमंत्र्यांनीही या पत्रावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आहे.
राज्यातील दलित, आदिवासी या उपेक्षित समाजघटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनासंदर्भात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लिहिलेले पत्र काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी भेट घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द केले. सोनिया गांधी यांनी अनुसूचित जाती, जमातींच्या योजनांबाबत दिलेल्या सूचना रास्त असून, सरकारचा घटक पक्ष म्हणून काँग्रेसने कायम या समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जसे मार्गदर्शन करीत असतात. तसेच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यासुद्धा मार्गदर्शन करतात. उभय नेत्यांची प्रत्यक्ष भेट झालेली नसली तरी हा पत्ररूपी संवाद आहे. दलित व मागासवर्गीय समाजाच्या कार्यकर्त्यांची एक बैठक काँग्रेस पक्षाने आयोजित केली होती. या बैठकीत काही मुद्दे चर्चेत आले होते. त्या संदर्भात सोनिया गांधी यांनी पत्र लिहून काही सूचना केल्या आहेत, असे थोरात यांनी सांगितले.