मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांनी महाविकास आघाडी सरकार दोन महिन्यात पडणार असल्याचं वक्तव्य करणाऱ्या भाजप नेंत्यावर टीकास्त्र सोडलं आहे. आशिष शेलार किंवा इतर भाजप नेत्यांची विधानं वैफल्यग्रस्त माणसांची विधानं आहेत. मोठा पक्ष ठरुनही सरकार बनवू शकले नाहीत, याची सल त्यांना आहे. महाविकास आघाडी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं भाजप नेत्यांना वैफल्य आले आहे, असं अनिल परब यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष चालणार आहे. कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचू नये. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये गेलेले नेते सोडून जाऊ नये म्हणून भाजप नेते सरकार पडणार असल्याची भाषा करत असल्याचे अनिल परब म्हणाले. विधान परिषद निवडणुकीनंतर सरकार पडेल असे सांगणे म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहे. कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी भाजप नेत्यांना बोलावं लागतेय. भाजपकडे दुसऱ्या पक्षातून गेलेले नेते माघारी जाऊ नये म्हणून भाजपकडून तारखा देण्यात येत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: आपल्या मार्गाने चालले आहेत. जे आरोप करतात ते चिल्लर लोक आहेत, मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर द्यावं इतकी त्यांची लायकी नाही. आरोपांना उत्तर देण्यापेक्षा जनतेची सेवा करण्याचं काम उद्धव ठाकरे सरकार काम करत आहे, असं अनिल परब यांनी स्पष्ट केले.
मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला
महाविकास आघाडीत कोणत्याही कुरबुरी नाहीत. सर्व प्रश्नांवर तिन्ही पक्ष एकत्रितपणे निर्णय घेत आहेत. त्यामुळे कोणत्याही कुरबुरी नाहीत. शिवसेना किंवा मविआला सूडाचं राजकारण करायचे नाही. ठाकरे सरकार आणि ठाकरे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. ईडीचा वापर, सीबीआयचा वापर करत आहात. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना करु द्यायला हवा होता. मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप अनिल परब यांनी केला.
यंत्रणांचा वापर करुन दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. महानगरपालिकेची कारवाई न्यायालयानं थांबवलेली नाही. बेकायदेशीर बांधकाम पाडू नका, असं हायकोर्टानं म्हटलं नाही, असं अनिल परब यांनी स्पष्ट केले. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात प्रताप सरनाईकांनी भूमिका घेतली होती. प्रताप सरनाईक यांच्या प्रकरणात सर्व सत्य बाहेर येईल. जे केंद्र सरकारविरोधात बोलतात त्यांना भीती दाखवण्याचा प्रकार आहे. आम्ही चौकशांना घाबरत नाही. सूडाचं राजकारण यापूर्वी केलं नव्हतं, सूडाचं राजकारण कधीही टिकलेलं नाही. आमच्या चूका दाखवा, महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगल्या सूचना असतील तर सांगा, एकमेकांना मदत करुन राज्याचा विकास करुन, असं अनिल परब म्हणाले.
कोरोनापासून जनतेला वाचवण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारं अथक प्रयत्न केले. कोरोनात सरकारनं जे काम केले त्याबद्दल संपूर्ण देशानं राज्याचं कौतूक केले. महाविकास आघाडीच्या ज्या योजना ठरल्या होत्या त्या पूर्ण करण्याचं काम करणार आहे.
मराठा आरक्षणाच्याबाबतीत मागील सरकारनं दिलेले वकील सर्वोच्च न्यायालयात लढत आहेत. सरकारनं प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्याचा अर्ज केला. सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे, राज्यानं स्थगिती दिलेली नाही. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. नामवंत वकील यासाठी लढत आहेत. स्थगिती उठवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं अनिल परब यांनी सांगितले.
Read Also :
सूडाच्या मार्गाने जाण्यास आम्हाला भाग पाडू नका, मुख्यमंत्र्यांचा भाजपला इशारा
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर देहविक्री करणाऱ्या महिलांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा
“जनतेचं बहुमत नसतानाही…,” पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारवर टीका
“सर्वोच्च आणि उच्च न्यायालयालासुद्धा ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का?,” फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल