मुंबई : महाराष्ट्रातील महिलांना भाऊबीज सणानिमित्त भयमुक्त वातावरणाची ओवाळणी मुख्यमंत्री देणार का?, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील बी.एस्सीच्या अंतिम वर्षामध्ये शिकणाऱ्या तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
भयमुक्त व भितीमुक्त महाराष्ट्राची राज्यातील तमाम भगिनींना या भाऊबीजेला भेट द्या मुख्यमंत्री महोदय
महिलांचे डोळे फोडले जाताहेत.. त्यांना जिवंत जाळल जातयं..लहानग्या मुलींवर बलात्कार/सामुहीक बलात्कार होताहेत.. छेडछाडीला सोमोरं जावं लागतयं आणि हे रोज रोज रोज होतयं @CMOMaharashtra pic.twitter.com/nDi5GeVkXt
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 12, 2020
सरकारमधील नेते हाथरसच्या घटनेचा निषेध करतात, महाराष्ट्रातील घटनांवर काहीही बोलत नाहीत. महिला सक्षमीकरणाच्या, नावाखाली सरकार महिलांची दिशाभूल करण्याचे काम सरकार करत, अशी टीका चित्रा वाघ यांनी सरकारवर केली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. महिला आयोगाला अध्यक्ष दिला जात नाही. दिशा कायदा महाराष्ट्रात लागू केला जात नाही. माझे कुटुंब माझे जबाबदारी बोलून चालणार नाही, त्यावर कृती करावी लागेल. महाराष्ट्रातील महिलांना भाऊबीज सणानिमित्त भयमुक्त वातावरणाची ओवाळणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देणार का?, असा सवाल त्यांनी मुख्यंमंत्र्यांना केला.