मुंबई : महाराष्ट्रात आजपासून (1 मे) 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. मात्र, लसींच्या अभावी अनेक लसीकरण केंद्रांवर याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जनतेशी संवाद साधताना सर्वच नागरिकांनी लगेच उद्यापासून लस केंद्रांवर गर्दी करू नये, कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतर जी तारीख आणि वेळ मिळेल त्या दिवशी जाऊन लस घ्यावी, असे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यास प्रारंभ होणार आहे. राज्य शासनानेही लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात या वयोगटात 6 कोटी नागरिक आहेत त्यांना प्रत्येकी 2 डोस म्हटले तरी 12 कोटी लसीची आवश्यकता आहे. आपण दररोज 10 लाख लोकांचे लसीकरण करू शकतो एवढी महाराष्ट्रात क्षमता आहे. परंतु लस वितरण हे ऑक्सीजन आणि रेमडेसीवीर प्रमाणे केंद्र शासनाच्या अखत्यारितील विषय आहे. राज्याला उपलब्ध होणारी लस ही मर्यादित आहे. त्यामुळे थेट लस केंद्रावर जाऊन गर्दी करू नये, लस केंद्रे ही कोविड प्रसाराची केंद्रे होऊ नयेत यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.
पंतप्रधानांकडे पत्राद्वारे प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र ॲप तयार करण्याची व ते कोविन ॲपला जोडण्याची किंवा राज्यांना त्यांचे ॲप तयार करू देऊन ते कोविन ॲपला जोडण्याची मान्यता द्यावी अशी मागणी केली असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले. नोंदणी करताना ॲप क्रॅश होत होते, या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे.